इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जाना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने पुर्वी ३१ मार्च ही अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली होती. मात्र, उमेदवारांना कागदपत्रांसाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचे परीक्षार्थीनी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांचा जास्तीचा कालावधी मिळणार आहे.
पोलीस विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार येत्या दिनांक ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याबाबत Mahait या संकेतस्थावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून,
त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत १५ एप्रिल पर्यंत देण्यात येत आहे.
मराठा समाजातील तरुणांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यास संबंधित उमेदवार प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोस्ट पावती अर्जासोबत सादर करू शकतात. मात्र कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी त्यांचे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. असेही पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांकडे हवेत ही प्रमाणपत्रे…
पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी-बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथा बाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, एनसीसी प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.