इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
२०१९ मध्ये मोदींनी महाराष्ट्रात सात मोठ्या सभा घेतल्या. यंदा १२ सभा घेतल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक पुढे सरकत नाही. ते पुढील पाच वर्षांतील विकासाबाबत बोलत नाहीत. त्यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून प्रत्येकी ७०० रुपये देऊन गर्दी जमा केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सभेला प्रतिसाद मिळत नसल्याने मोदींची भाषा घसरली असून ते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. लोकसभा प्रचाराच्या मध्यावर येऊन पोहोचली आहे. व्यक्तिगत मोदींविरोधात देशभरात लाट दिसत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, निवडणूक रोखे भ्रष्टाचार, सत्ता गैरवापर, व्यक्तिकेंद्रित राजकारण या मुद्द्यांवर लोक त्यांच्या विरोधात आहेत. निवडणूक रोखे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे भाजपला यातून मिळालेले पैसे निवडणूक आयोगाकडे जमा झाले पाहिजेत. निवडणूक रोखे, खंडणीतून जमा झालेला पैसा मते विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. मोदींच्या एका सभेचा खर्च पाच कोटी असून त्यांचा प्रभाव पडत नसल्याने त्यांची सभा नको असे भाजप कार्यकर्ते सांगत असल्याचा दावाही चव्हाण यांनी केला.
अबकी बार ४०० पार भाजपला शक्य होणार नाही
चव्हाण म्हणाले की, अबकी पार ४०० पार अशी घोषणा देऊन मोदींनी प्रचाराला सुरूवात केली. पण ती घोषणा प्रत्यक्षात आणणे शक्य होणार नाही, असे त्यांच्या लक्षात येत आहे. केवळ त्यांच्याच नव्हे तर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनाही हे उमगू लागले आहे.