इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी होणाऱ्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. सरकारमध्ये असतानाही शिंदेच सर्व निर्णय घेत होते, याचा मी साक्षीदार आहे. तरीही शिंदे यांनी ठाकरे यांचा विश्वासघात केला,” अशी टीका काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी ते पुण्यात आले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, अजित दरेकर यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, “यापूर्वी राज्यात होणाऱ्या निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार जागा ठरवत. त्यात शरद पवार कधीही हस्तक्षेप करत नव्हते. मात्र आज अजित पवारांची अवस्था काय आहे. त्यांनी आज एवढे मिंधे होण्याची गरज काय? भाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले. महाविकास आघाडीच्या काळात या दोघांना जी उंची होती; ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजपबरोबर जाऊन स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे.”
ठाकरे म्हणाले…
• फडणवीस व भाजपने सूड उगवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडले
• अजित पवारांना मोदी-शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेतले
• षड्यंत्र करणारे सर्वांना माहीत; अजित पवार, एकनाथ शिंदे केवळ मोहरे
• अजित पवारांना चार जागा दिल्या; त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले
• पक्ष फोडणे आणि चिन्ह चोरण्यात भाजप व्यग्र