इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती – केंद्रातील सरकार हे कामगारविरोधी आहे, कामगार संघटना व कामगारांच्या हिताच्या विरोधातील कायदे आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी केली.
बारामतीत शुक्रवारी (ता. 22) आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी, कष्टकरी व कामगार महामेळाव्यात ते बोलत होते. जगन्नाथ शेवाळे, राजेंद्र पवार, सदाशिव सातव, सतीश खोमणे, अँड. एस.एन. जगताप, वनिता बनकर, राजेंद्र काटे देशमुख, तुकाराम चौधर, नानासाहेब थोरात, शिवाजी खटकाळे, भारत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्हालाही तिकडे जाता आले असते, मी आणि रोहित दोघेही मंत्री होऊन लाल दिव्याच्या गाडीत आलो असतो, पण तुम्हीच सांगा की मी माझे वडील जो संघर्ष करीत आहेत, त्यांना साथ द्यायची, सत्याच्या बाजूने उभे राहायचे की सत्तेला जवळ करायचे…. रोहितने आमची साथ दिली म्हणून त्याच्यामागे ईडी लावली, आज अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत की नाही हे अनेकदा बोलूनही भाजपचा एकही नेता त्यावर मला उत्तरच देत नाही. अनेक घोटाळे मला माहिती होते पण घोटाळाही आदर्श असू शकतो हे पहिल्यांदाच समजले.
कुणी कुणाचा प्रचार करावा कुणाच्या बाजूने जायचे हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ती दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आज चौकशीचा ससेमिरा व त्रास देण्याची आमची वेळ आहे पण उद्या तुमच्यावरही ही वेळ येणार आहे हे विसरु नका असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी उपस्थित कामगारांना दिला.
रोहित पवार म्हणाले, बारामतीचा सर्वांगिण विकास झाला त्यात सर्वांचेच योगदान होते पण याचा पाया पवारसाहेबांनी रचला आहे, अप्पासाहेब, माझे आई वडील यांच्यासह सुप्रिया ताई व अजितदादांचाही त्यात वाटा निश्चित आहे, पण साहेबांना विसरुन चालणार नाही, त्या मुळे भूमिका न बदलता मी आज माझ्या आजोबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला कायम मी त्यांच्यासोबत असेन. मोदी सरकारने कामगारांविरोधात कसे कायदे आणले आहेत याचे सविस्तर विवेचनही त्यांनी केले.
तुकाराम चौधर यांनी सूत्रसंचालन केले, नानासाहेब थोरात यांनी विचार मांडले.