इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : कात्रक चौकातून तुम्ही रोज ये-जा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला कात्रज चौक पुन्हा प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला आहे. यामुळे आता प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कात्रज चौकात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे, याच पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल करण्यात आले होते. मात्र, शनिवार पासून कात्रज चौक सुरु करण्यात आला आहे.
कात्रजचा विकास करण्यासाठी तसेच वाहने सुरळीत करण्यासाठी याठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामानिमित्त राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या सूचनेनुसार २९ नोव्हेंबर २०२४ पासून कात्रज चौकातील वाहतूक बदलण्यात आली होती. या भागातून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला होता.
या वाहतूक बदलामुळे कात्रज भागातील रहिवाशांना दररोज दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून कात्रज चौक पार करावा लागत होता. गेले सहा महिने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे अनेक अपघात देखील झाले, ज्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताचे प्रमाण पाहता अनेकांनी कात्रज चौकातून जाणे देखील टाळले होते. आता मात्र, कात्रज चौकातील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, ‘कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून या भागातील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.’ अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.