इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात उन्हाचा चटका जाणवत असताना आज राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिकमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भासह नाशिकमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज विदर्भात पावसाची शक्यता असली तरी उर्वरीत महाराष्ट्रात मात्र उन्हाचा कडाका जाणवणार आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव आणि सोलापूरमध्ये 44 अंशांपेक्षा जास्त, तर धुळे येथे 43 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे.
त्याचबरोबर जेऊर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आणि वाशीममध्ये 42 अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे. तसेच पुणे, सांगली, सातारा, परभणी, चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ येथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.