इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर, ता.३०: विवाहित महिलांवरील अत्याचार आणि छळाच्याघटना वाढत असतानाच शिरूर शहरातही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबुराव नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात मानसिक व शारीरिक छळ, हुंड्यासाठी त्रास आणि मारहाणीच्या आरोपाखाली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी पती अनिल सुरेश सालके, सासू शैलाबाई सुरेश सालके, सासरे सुरेश दगडू सालके, जाऊ रेश्मा गणेश सालके, आणि दीर गणेश सुरेश सालके (सर्व रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोहिनी उर्फ रेश्मा अनिल सालके (वय ३४, रा. बाबुरावनगर, शिरूर, जि. पुणे) यांना लग्नानंतर सुरुवातीला चांगले वागवण्यात आले. मात्र, लग्नाच्या नंतर सासरच्या लोकांनी माहेरून पैसे आणण्याची मागणी करत तिला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला.
तसेच, पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नात दिलेले अकरा तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेण्यात आले आणि तिच्या वडिलांकडून सासऱ्यांनी दोन लाख रुपये घेतले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करीत आहेत.