इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवाह कमजोर झाल्याने राज्यातील पाऊस ओसरण्याचे संकेत आहे. आज विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून, बांगलादेशातील ढाक्यापासून वायव्येकडे ११० किलोमीटर उंचीवर आहे. भारताच्या बेहरामपूरपासून उत्तरेकडे १४० किलोमीटर आणि शिलाँगपासून २६० किलोमीटर नैऋत्येकडे होते. ईशान्येकडे सरकत असलेली ही प्रणाली निवळू लागली आहे. शुक्रवारी दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपारा जवळ जमिनीवर आली आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती नाही. यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र 12 जूननंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय होईल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे