इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : मागील चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ४८ तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 48 तास पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी 40-50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पालघर, मुंबई, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट होऊन हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना घराबाहेर कामाशिवाय पडू नये असा इशारा दिला आहे.