इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामतीः बारामती आणि दौंडसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. बारामती, दौंड, इंदापूरला पावसाने झोडपले असून अनेक भागात पाणी साचल्याची नोंद आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून नीरा डावा कालवा फुटला आहे. अतिवृष्टीमुळे बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरातील पाणी कालव्यात मिसळल्याने पाण्याचा दाब वाढल्याने नीरा डावा कालवा फुटला आहे. ज्यामुळे जवळपासच्या भागात पाणी शिरले आहे. खबरदारी म्हणून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. पावसाचा कहर पाहता धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
केरळ येथे मान्सूनचे आगमन झाले असून त्यामुळे राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. बारामती भागात ढगफुटीसारखा पाऊस पडला असून एकाच रात्रीत ७ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बारामतीमध्ये वार्षिक सरासरी पाऊस सुमारे १४ इंचाचा आहे. तालुक्यात वर्षाला 450 मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु मागच्या 5 दिवसांत 314 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे पुणे, बारामती आणि दौंडसह महाराष्ट्रातील अनेक भागातील पिके आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यात ५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार नाही, असेही हवामान विभागाने म्हंटले आहे. तोपर्यंत असाच पाऊस सुरु राहणार आहे.