इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात पडलेल्या अवकाळी पावसाने अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे महानगरपालिकेने केलेल्या कामावर आणि दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तासभर पडलेल्या धो-धो पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. यामुळे शहरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची व प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली.
मागील काही दिवसांपासून पुणेकर उकड्याने त्रस्त होते. आज पावसाने दमदार एंट्री करत शहरातील मध्यवर्ती भागात पाणीच पाणी केलं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकडाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे झालेल्या अवकळी पावसामुळे वाहनचालकांची, रस्त्यावरील फळे विक्रेत्यांची मोठी तारांबळ झाली. यामुळे महानगर पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. अश्यातच पुढील 2 ते 3 दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यात आज सकाळपासून ढगांनी सूर्य झाकोळला होता. आज दुपारी शहरातील शिवाजीनगर, हडपसर, बाणेर, कात्रज, कोथरूड, औंध, वाघोली, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विजांचा कडकडाटासह धो-धो पाऊस बरसला. यामुळे काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून पुण्यात 14 आणि 15 मे हे दोन दिवस मेघ गर्जनासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत ठेवावे व आवश्यक ती खबरदारी बाळगावी असा सल्ला देण्यात आला आहे