इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाने नाट्यगृहात खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई केली आहे. पुण्यातील नाट्यगृहांची स्थिती पाहता या जुन्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण रंगमंदिरात नुकत्याच झालेल्या एका घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, जिथे नाटकादरम्यान एका महिलेच्या साडीत उंदीर शिरला होता. दरम्यान, प्रत्येक नाटकापूर्वी आणि नंतर थिएटर स्वच्छ करण्यात येणार आहेत. सर्व नाट्यगृहांमध्ये कीटक नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातील. तसेच उंदरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी सर्व नाट्यगृहांमध्ये उंदरांना पकडण्यासाठी पिंजरे ठेवण्यात येणार असून सर्व नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोल केले जाणार आहे.
या घटनेनंतर पालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत भवन विभाग, नाट्य कलाकार, विद्युत विभाग, आणि नाट्य व्यवस्थापकांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, नाट्य व्यवस्थापक मोहन कुलकर्णी, प्रवीण बर्वे, संवाद पुणेचे अध्यक्ष महाजन, सत्यजित धांडेकर, शिरीष रायरीकर, नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, विद्युत विभागातील अधिकारी सहभागी झाले होते.