इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा असल्याने दररोज हजारो नागरिक या ठिकाणी ये -जा करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा हे दोन भुयारी मार्ग तयार करण्यासाठी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांची भेट घेत प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले आहेत. तसेच हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती आमदार रासने यांनी दिली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्तावित भुयारी मार्ग हा कायमस्वरूपीचा तोडगा ठरणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी हा मोठा बदल घडवून आणणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाने लवकरच पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.