इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कटक : रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानेइंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका आपल्या नावे केली आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध 2-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने चांगली सुरुवात केली. इंग्लंडने 49.5 षटकात सर्व गडी गमवत 304 धावां केल्या आणि भारताला विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होतं.
विजयासाठी 305 धावांचं आव्हान समोर असताना रोहित शर्माचा फॉर्म पाहता हे आव्हान पार करणं सोपं वाटत नव्हतं. पण रोहित शर्माचा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्म परत आला आहे. शर्माने 90 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 119 धावा चोपल्या. चॅम्पियन्स ट्रॉफूर्वी सूर गवसल्याने क्रीडाप्रेमीही खूश झाले आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सुकर झाला. भारताने 44.3 षटकात 6 गडी गमवून हा सामना आपल्या नावे केला.
रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी रचली. शुबमन गिल 52 चेंडूत 60 धावा करून माघारी परतला. त्यानंतरही रोहित शर्माने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत वनडे क्रिकेट कारकिर्दितलं दुसरं वेगवान शतक झळकावलं. त्याने यापूर्वी दिल्लीत 2023 साली अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध 76 चेंडूत शतक ठोकलं आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीत डाव सावरला. पण अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्या धाव घेण्यावरून विसंवाद झाला आणि श्रेयस अय्यर 44 धावांवर बाद झाला.
विराट कोहली मात्र या सामन्यात अपयशी ठरला. कोहलीने 8 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकर मारत 5 धावा करून माघारी परतला. दुसरीकडे, मोहम्मद शमीही सुरुवातीच्या षटकात काही खास करू शकला नाही. त्याला फक्त शेपटच्या एका फलंदाजाला बाद करता आलं.