इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर मागील पाच दिवसाच्या कालावधीत लोणी काळभोर (ता. हवेली) वनविभागाच्या हद्दीतील रामदरा डोंगराच्या परिसरात वणवा लागल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहे. ही आग लागली की लावली? असा सवाल तयार होत आहे. मात्र लोणी काळभोर वनविभागाने तत्परता दाखविल्याने दोन्ही ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी लवकर यश आले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. याच डोंगराच्या कुशीत तीर्थ क्षेत्र रामदरा शिवालय आहे. त्यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, याच डोंगरात रविवारी (ता.2) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला होता. हा वणवा विझविण्यासाठी लोणी काळभोर वनविभाग व ग्रीन फाउंडेशनच्या सदस्यांनी दोन तास प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळविले होते.
ही घटना ताजी असतानाच, गवळेश्वर परिसरातील डोंगरात गुरुवारी (ता. 6) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वणवा लागला होता. या घटनेची माहिती मिळताच, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविली होती. मात्र या दोन्ही घटनांमधील आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून, अंडी व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणांची आहुती दिली आहे.
दरम्यान, लोणी काळभोरचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वन रक्षक अंकुश कचरे, प्रीती नगरे, तुळशीराम कोंढारे व ग्रीन फाउंडेशनच्या सदस्यांनी सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ आगीच्या ठिकाणी दाखल झाले. सर्वांनी वणवा विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
वणवा लागण्याची कारणे…
पावसाळ्यात गवत चांगले यावे, म्हणून वणवे लावले जातात. काही जण सहज जाताजाता विडी, सिगारेट पेटवून टाकतात. त्यामुळे आगी लागतात. काही जण केवळ हौस म्हणून आग लावतात, तर काही जण शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात. तीच आग आटोक्यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात. वनातील अथवा वनालगतच्या शेतातील झाडांवर असणारे मधमाशांचे पोळे काढण्यासाठीही आग लावली जाते.