इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात गारठा ओसरला असून उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढतच असल्याची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमान 18-22 अंश सेल्सिअस गेल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी सोलापूर, साताऱ्यात किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते. नांदेड-लातूरमध्ये 21 अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यात शुक्रवारी (7 फेब्रुवारी) 18-20 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.
राज्यात बहुतांश ठिकाणी किमान व कमाल तापमान वाढले आहे. मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका बसू लागला आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेल्याचे बघायला मिळाले. राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात हवामान कसे राहील?
राज्यात मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या 24 तासात ही वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 5 दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिक असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात तापमानात वाढ होणार आहे.