Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजराज्यातून थंडीचा काढता पाय, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण..

राज्यातून थंडीचा काढता पाय, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. शुष्क कोरडे वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले असून येत्या 5 दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. हळूहळू 2-3 अंशांनी तापमानवाढीला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान केंद्राकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 3-4 दिवसांत कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. कमाल तापमान 3-4 अंशांनी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह राजस्थान आणि त्यालगत मध्य पाकिस्तान भागात सक्रिय झाला आहे. तर यापुढे पश्चिमी चक्रावात वायव्येस राहणार आहे. राज्यात येत्या दोन दिवसात तापमानात चढउतार राहणार आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. आता उन्हाचा चटका वाढला असून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत असल्याचे दिसत आहेत.

राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. दिवसाचे तापमान चढ-उतार होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता अधिक जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा कल असाच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे (लोनिकालभोर, हवेली) व सोलापूर (मोहोल केव्हीके) येथे राज्यातील सर्वात कमी तापमान 13.2°C नोंदवले गेले आहे. यानंतर 13.7°C तापमान पुणे (तळेगाव) येथे नोंदवले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान 39.9°C होते, आणि ते नंदुरबार (शहादा AWS400) येथे नोंदवले गेले. त्यानंतर 38.9°C तापमान अकोला AMFU येथे नोंदवले गेले. 38.6°C तापमान सातारा (कराड) येथे, तर 38.5°C तापमान चंद्रपूर (टोंडापूर AWS400) येथे पाहायला मिळाले.

राज्यात तापमान कसे होते ?

विदर्भ आणि मराठवाड्यात 35°C ते 39°C कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रताही होती. साधारण 27°C ते 34°C दरम्यान कमाल तापमान राहिले आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळच्या वेळी थोडा गारठा जाणवून आला. मुंबई आणि किनारपट्टी भागात आर्द्रतेमुळे कमाल तापमान कमी असले तरी उष्णता आणि उकाडाच अधिक जाणवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments