इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पवनानगर (मावळ): पवना धरणाकाठी मोटार सुरु करण्यासाठीगेलेल्या ग्रामपंचायतच्या शिपायासह बिबट्याने सहा जणांवर हल्ला केल्याचे वृत्त असून जखमींवर औंध येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पवनमावळ परिसरातील शिंदगावात घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ग्रामपंचायत शिपाई बाळू शिंदे हे शुक्रवारी (दि.७) सकाळी पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी पवना धरणाकाठी गेले असता त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. भयभीत झालेल्या शिंदे यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने आसपासच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
यावेळी बिबट्याने सहा जणांवर हल्ला केल्याची माहिती मिळाली असून जखमींवर जिल्हा रुग्णालय औंध येथे उपचार सुरु आहेत. त्यात बाळू राघु शिंदे (वय ४२, शिंदगाव, ता. मावळ, जि. पुणे), गफूर पापा शेख (वय ६५, रा. आंबेगाव), ज्ञानेश्वर श्रीपती राजिवडे (वय ६०, रा. आंबेगाव, ता. मावळ), प्रवीण रामभाऊ राजिवडे (वय ३४, रा. आंबेगाव), भक्तिश्वर ज्ञानेश्वर राजिवडे (वय ३०, रा. आंबेगाव) आणि बिबट्याला रेस्क्यू करणारे वन्यजीव रक्षक संस्थेचे शत्रुघ्न रासनकर यांचा समावेश आहे.
नागरिक आरडाओरडा करून बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, बिबट्या त्याचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होता. तो जवळच्याच एका कॅम्पिंग साईटकडे गेला. तिथेही ग्राहक आणि स्थानिकांची वर्दळ असल्याने त्याने तिथेच उंच असलेल्या उंबराच्या झाडावर चढून आपला जीव सुरक्षित केला. बिबट्याला पकडून रेस्क्यू सेंटरकडे पाठवण्यात आल्याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी दिली.