इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अहिल्यानगर : पुण्यातील मुळशीचा पृथ्वीरज मोहोळ याने 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारून प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकवा आहे. अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करून विजय मिळवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम लढत रंगली होती. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पहिला पॉईंट मिळाला. तर दुसरा पॉईंट महेंद्र गायकवाडने मिळवला आणि बरोबरी साधली. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळने पुन्हा एकदा एक पॉईंट घेतला. त्यानंतर मात्र काहीसा गोंधळ झाल्याचे दिसून आले आणि महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं. त्यामुळे पंचांकडून पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आले.
विजयानंतर पृथ्वीराज मोहोळला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चांदीची गदा आणि थार गाडी देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
महेंद्र गायकवाडने मैदान का सोडलं?
पृथ्वीराज मोहोळने दुसरा गुण मिळवल्यानंतर त्याबद्दल महेंद्र गायकवाडकडून पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. पृथ्वीराजला दुसरा गुण हा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्याने मैदान सोडलं. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं. सामन्याच्या दरम्यान काही प्रेक्षकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आले. पण, पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केलं. त्याचवेळी महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं.
शिवराज राक्षेने मारली पंचांना लाथ
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील उपांत्य सामन्यात गोंधळ झाला आहे. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्याचा निकाल देताच डबल महाराष्ट्र केसरी अशी ख्याती असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथच मारली. त्यानंतर या स्पर्धेत अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला. अखेर पोलिसांना यावेळी मध्यस्थी केली.
नेमकं काय घडलं?
मॅट विभागामधून नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडत होता. दोघांमध्ये अटीतटीची लढत सुरु असताना शिवराज राक्षे याचा पराभव झाल्याचं पंचांनी जाहीर केलं आणि त्यानंतर हा राडा झाला. शिवराज राक्षेकडून पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचवेळी संतापलेल्या शिवराजने पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथही मारली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.