इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.४) मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण हत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गातील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले. या भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट दाखवली. या बैठकीत सर्वं लोकप्रतिनिधींनी येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. यासोबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची रणनीती ठरवण्यात आली असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गामध्ये प्रस्तावित बदल करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये मोठी चिता निर्माण झाली आहे. रेल्वेमार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सत्यजीत तांबे, दिलीप वळसे पाटील, अमोल खताळ हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर खासदार राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे आणि शरद सोनवणे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
सदर रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द केला असून, त्याऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वीच्या, रेल्वेमार्गामुळे जीएमआरटी केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींची आहे, या दृष्टीकोनातूनच ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे.