इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी शेतात घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असताना आता या अपघातप्रकरणी ट्रॅक्टर चालक नागेश आवटे आणि शेत, विहीर मालक दगडोजी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे हा भीषण अपघात शुक्रवारी (4 मार्च) घडला आहे. हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने काही शेतमजूर महिलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पार्वतीबाई बुरड या महिलेच्या तक्रारीवरून लिंबगांव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकासह शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दगडोजी लक्ष्मणराव शिंदे यांचे शेतातील विहिरीला कठडा बांधलेला नसताना व विहिरीजवळून जाण्यासाठी रस्ता नाही याची जाणीव असताना देखील ट्रॅकटर चालकाला जाण्याचे सांगितले. तर ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याने 10 मजुर बसवून जात ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून जाणीवपुर्वक सदरचे ट्रॅक्टर मजुरासहीत पाण्याने भरलेल्या विहीरीत टाकुन अपघात घडवून आणला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या अपघातात ताराबाई सटवाजी जाधव, धुरपताबाई सटवाजी जाधव, सिमरन संतोष कांबळे, सरस्वती लखन बुरड, चौत्राबाई माधव पारधे, सपना उर्फ मिना राजु राऊत, ज्योती ईरबाजी सरोदे यांचा बुडून मृत्यू झाला. तर पार्वतीबाई राम भुरड, पुरभाबाई संतोष कांबळे, सटवाजी जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.