इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
ठाणे: ठाण्यातील अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर भयंकर घटना घडली आहे. येथे प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती 35 वर्षाची आहे, ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. त्यानंतर, सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या २९ वर्षाच्या तरुणाशी जुळले होते. या प्रकरणातील सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे मागील ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सीमाने राहुलला हातउसने पैसे दिले होते. यानंतर पैसे परत दे नाहीतर लग्न कर अशी मागणी महिलेने केली.
यावरून झालेल्या वादातून त्याने सीमाची भरदिवसा रेल्वे स्थानकावर हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. राहुल आणि सीमा यांच्यात प्रेमसंबंध असले तरी त्याचा डोळा सीमाच्या १३ वर्षांच्या मुलीवर देखील होता, अशी धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून समोर आली आहे.
सीमा राहुलशी लग्न करणार असल्याचे राहुलच्या आईला कळल्याने..
मिळालेल्या माहितीनुसार, महिला सीमा राहुलशी लग्न करणार असल्याचे राहुलच्या आईला कळल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद होत होते. राहुल तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तुझ्या मुलीसोबत करेल असे म्हणत राहुलची आई सीमाला धमक्या देत होती. मात्र सीमाला राहुलने लग्नाचे आमिष दाखवल्यामुळे तिने राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते, राहुल सीमासोबत लग्न करणार होता.
सीमाला फोन करून बोलावून घेतले..
यानंतर राहुलने सीमाला फोन केला आणि तुझे पैसे देऊन टाकतो असे म्हणाला. मग ठरलेल्या ठिकाणी भेटीसाठी सीमा पैसे घेण्यासाठी अंबरनाथ स्टेशन परिसरात गेली. त्यानंतर दोघेही अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून पायी चालत अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे गेले.
राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला की राहुलने सीमावर धारदार शस्त्राने वार केले. त्यांनतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीमाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केले.