इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली जात असतानाच आता कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना सवाल करत शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता नवीन वादाची ठिणगी पडली आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. कृषिमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हा निर्लज्जपणाचा कळस आहे. राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याचा कृषिमंत्री अशा स्वरूपाच वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मतदारांनी केली नव्हती. मत मागण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू, अशी घोषणा तुम्ही केली होती. कर्जमाफी होत नाही म्हणून वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही शेतकऱ्यांना बदनाम करत आहात हे बरोबर नाही, असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे.
दरम्यान, एकीकडे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. याबाबत चिंता करण्याची आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही हे दुर्दैव आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.