इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मालेगाव | शेतीत सध्या ट्रॅक्टर युग सुरु असलं तरी प्रत्येक काम ट्रॅक्टरने होत नाही, आणि प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर अजूनही परवडत नाही. यासाठी आजही सर्जाराजाची साथ शेतकऱ्याला आहे. सर्वात महत्वाचं असं आहे, बैलजोडीची किंमतही आता काही कमी राहिलेली नाही, तसेच सर्जाराजाची देखरेखही सोपी नाही, या कामात शेतकऱ्याला सुटी नाही, पण शेतकऱ्याची सर्जाराजाला आणि त्याची आपल्या मालकाला साथ कायम आहे, या सर्जाराजासमोर त्याला कारही फिकी वाटते. महाराष्ट्रात असाच सर्जाराजाच्या जोडीचा सौदा झाला, शेतकऱ्याने ही बैलजोड साध्या कारच्या किंमतीत घेतली, आज मालकाला यांची पैशात किंमत मोजावी लागली, पण या त्याच्यासाठी मोलभाव अमूल्यच आहे.
तुम्ही नवी कार खरेदी करुन घरी आणतात तेव्हा तिची पुजा करतात, पण शेतकरी यात मागे नाही, या धन्यानेही आपल्या बैलजोडीची गावभर बँड लावून सवाद्य मिरवणूक काढलीय. कार नाही हेच त्याच्यासोबत शेतीत राबणारे यार आहेत, हे त्याला नक्की माहित आहे. त्याच्या सर्व घरासाठी ही बैलजोड म्हणजे नवीन सदस्य आहेत. या बैलजोडीला पाहून तुम्हाला तांबडी माती या मराठी चित्रपटातील गाणं नक्की तोंडी येणार आहे. डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा, येग रामाच्या बानाचा रं बानाचा. एवढी रुबाबदार ही खिलार जातीची बैलजोड आहे.
कारच्या किंमतीत बैलजोडी विक्री झाल्याचे सांगितल्यास तुम्हाला नवल वाटेल, मात्र नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड राजूबाबा सूर्यवंशी या शेतकऱ्याने नामपूर बाजार समितीमधून चक्क 5 लाख 51 हजार रुपयांना खिलार जातीची रुबाबदार बैलजोडी खरेदी केली. विशेष म्हणजे या बैलजोडीची गावातून बँडच्या गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. फेटा बांधलेले ग्रामस्थ या मिरवणूकीत सहभागी झाले. घरोघरी बैलजोडीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
दरवर्षी एकादशीला काढण्यात येणाऱ्या मुंजवाड ते बेज पायी दिंडीतील रथासाठी ही बैलजोडी खरेदी करण्यात आली. देवाच्या कामाला ही बैलजोडी असणार असल्याने त्यांची किंमत करायची नाही, म्हणून सांगितल्या किंमतीला ही बैल केल्याचे सांगितले जात आहे.
सध्या महाराष्ट्रात बैल गाडा शर्यतीत अनेकांना एकच नाद लागला आहे, त्यात नाद एकच एकच एक बैलगाडा शर्यत हे बोल पुढे आले आहेत, पण शेतात राब राब राबणाऱ्या धन्याला साथ देणाऱ्या या बैलजोडीशी बैलगाडा शर्यतीतल्या बैलाशी तुलना होऊ शकत नाही. बैलगाडा शर्यतीतील बैल तर या पेक्षाही जास्त किंमतीत विकले जात आहेत. एकंदरीत ट्रॅक्टर युगातही शेतीत आज बैलांना एक वेगळं महत्त्व आहेच, त्यांच्याशिवाय त्यांचा धनी शेतकरी आणि ती शेती देखील शोभून दिसणार नाही.